महात्मा गांधीजींचा चष्मा, चरखा प्रतिकचिन्हेचे लोकार्पण आयुक्त अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते संपन्न

अनंतकुमार गवई
नवी मुंबई
‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ ला सामोरे जाताना मागील वर्षीचे देशातील तिसरे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांच्या सहयोगाने सज्ज झाली असून कच-याची सुयोग्य विल्हेवाट लावण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पर्यावरण विघातक अशा कच-याकडे बारकाईने लक्ष देत, त्याचे योग्य संकलन व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट यांचे व्यवस्थापन सुनियोजित पध्दतीने करणारी नवी मुंबई ही अग्रणी महानगरपालिका असून स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने कच-यापासून बनविलेली मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर कलाकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत कच-याविषयी जागरूकता निर्माण करेल असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ उद्घाटन सोहळाचे सुरुवात टाकाऊ कच-यापासून महात्मा गांधीजींचा चष्मा व चरखा ही प्रतिकचिन्हे साकारलेल्या कलात्मक शिल्पाकृतीचे लोकार्पण महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयासमोर संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, उपआयुक्त मनोजकुमार महाले, योगेश कडुस्कर, क्रांती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते तसेच शिल्पाकृती रचयिता ग्लोबलग्रीन इनोवेटर्स प्रा. ली. आणि ग्रीन सोसायटी फोरमचे बनॉय के, जसपाल सिंग नेओल, देवेंद्र सिंग , पत्रकार मछिंद्र पाटील, मनोज जालनावाला आणि सहकारी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने “टाकाऊतून टिकाऊ” ही संकल्पना राबवत नवी मुंबई महानगरपालिका आणि ग्लोबलग्रीन इनोवेटर्स प्रा. ली. व ग्रीन सोसायटी फोरम या संस्थेच्या माध्यमातून कचरा यापासून बनविलेले महात्मा गांधीजींचा चष्मा व चरखा ही प्रतिकचिन्हे अभिनव शिल्प साकारण्यात आले आहे.
यापूर्वीही ‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना राबवित ग्रीन सोसायटी फोरमने महापालिका मुख्यालयात आणि स्वच्छता पार्क कोपरखैरणे येथे संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्डपासून भारत देशाच्या नकाशाची शिल्पाकृती साकारली होती. ज्याला ‘मदर इंडिया बोर्ड’ असे आकर्षक नाव देण्यात आले होते. त्याचेच पुढचे पाऊल टाकत कलात्मक विचारांच्या या समुहाने नागरिकांनी टाकून दिलेल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची 7 हजार झाकणे 5 दिवस शहरभर फिरून जमा केली व त्यामधून दहा दिवसात फिफा स्पर्धेच्या “रिसायकलेडेलिक फिफा म्युरल” हे अभिनव शिल्प महापालिका मुख्यालयासमोर साकारले होते. ई कचरा यापासून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ ही कलात्मक शिल्पाकृती ११० संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्ड पासून आठ दिवसात बनवल़ी होते. त्यापुढे जात नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या या संस्थांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा कचरा यापासून महात्मा गांधीजींचा चष्मा व चरखा ही प्रतिकचिन्हे ही कलात्मक शिल्पाकृती जुन्या टाकाऊ सायकलींच्या विविध भागांचा वापर करून तीन दिवसात बनवल़ी आहे. सडे पाच फुट लांब आणि अडीच फूट उंचीची ही वर्तुळाकार शिल्पाकृती आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘शून्य कचरा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत पर्यावरणशील स्मार्ट कलात्मक शहर ही नवी मुंबईची ओळख या शिल्पामधून निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या शिल्पाच्या माध्यमातून मानवी वर्तनात पर्यावरणपूरक बदल घडावा यासाठी एका बाजूने कच-याची नीट विल्हेवाट लावणे व दुस-या बाजूने टाकाऊ कच-याचे कला स्वरुपात रुपांतर करणे ही भूमिका नजरेसमोर ठेवण्यात आली आहे. हे टाकाऊतून टिकाऊ शिल्प साकारणा-या बीनॉय के, जसपाल सिंग नेओल, देवेंद्र सिंग, मछिंद्र पाटील यांच्यासह व्हर्चुअल कलादिग्दर्शक रवी कृपलानी आणि त्यांच्या सहका-यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर साकारलेले हे शिल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.