नवी मुंबईत कोरोनाचे दुःख विसरुन कोरोना रुग्णांनी पीपीई कीट घालून धरला गरब्याचा ठेका

अनंतकुमार गवई नवी मुंबई –
मार्च महिन्यापासून आपण सर्वजणच कोरोना महामारीशी मुकाबला करीत आहोत व आजही ही लढ़ाई आपण तेवढ्याच आत्मविश्वासाने लढत आहोत. या लढ़ाईमध्ये आपल्याला सर्वात जास्त मदत ज्यांची झाली असलेलं तर ते डॉक्टर, नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफचीच. भारतातील सर्वच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यानी या लढाईमध्ये हिंमतीने व जिद्दीने सहभाग घेतला आहे व रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांची आत्मीयतेने काळजी घेत आहेत. कोरोना झाल्यानंतर अनेक रुग्णांची मानसिक स्थिती फारच बिकट होते, कोरोना पॉजिटीव्ह आला म्हणजे आता आपल्या आयुष्यात सर्व निगेटिव्हच होणार अशी भावना त्यांच्यामध्ये वाढीस लागते. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नवी मुंबई नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे काल गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी पीपीई कीट घालून उत्तम प्रतिसाद दिला. यापूर्वी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना बसल्या जागेवरून योग प्रशिक्षण तसेच नर्सेसकडून रक्षाबंधन , समुपदेशन तसेच शाळेतील मुलांना ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम यापूर्वी राबविले गेले आहेत. काल आयोजित केलेल्या या गरब्यालासुद्धा कोरोना संक्रमित रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनामुळे निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या नागरिकांची संख्या आजमितीला वाढत आहे, अशा नागरिकांना समुपदेशन तसेच नियमांचे पालन करून संवाद साधण्याचे काम केले पाहिजे याच भावनेतून आम्ही गरब्याचे आयोजन केले होते अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री संतोष साइल यांनी दिली. देशभरात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असली तरीही कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांची संख्या दर दिवसा दुपटीने वाढत आहे. “कोविडची लक्षणं नसली तरीही कोरोना संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे अनेकांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले आहे अशा सौम्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी या गरब्यात सहभाग घेतला होता. गरबा खेळताना कोरोना संक्रमित झालेल्या सर्व रुग्णांनी मास्क, हातमोजे व पीपीई कीट घातले होते.”