नवी मुंबईकरांना प्रदूषित हवेचा विळखा

अनंतकुमार गवई
नवी मुंबई
कोरोनाकाळात आधीच कोरोना महामारीमुळे श्वास कोंडलेल्या नवी मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून दाट धुके आणि अशुद्ध हवेचा सामना करावा लागत आहे. यामुळे श्वसनाचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रदुषण नियंत्रण महामंडळ मात्र अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या धूसर वातावरणामुळे नवी मुंबईतील अनेक परिसर दूषित हवेचा सामना करत आहेत. यामध्ये कोपरखैरणे, बोनकोडे, महापे औद्योगिक वसाहत, नेरुळ, बेलापूर, उरण फाटा आदी परिसराचा समावेश आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे रस्त्यावर गाड्या नसल्याने तसेच कंपन्या बंद असल्याने नवी मुंबईतील प्रदूषण कमी झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नवी मुंबईला प्रदूषणाने घेरले आहे. रात्रीच्या वेळी हवेत दाट धुकं पसरत असून यात धूलिकणांचे प्रमाण जास्त आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. श्वास घेताना नागरिकांना त्रास होत असून अंगाला खाज येत आहे. या परिसरालगत महापे औद्योगिक वसाहत असून येथील कंपन्या हवेत रासायनिक वायू सोडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अगेदारच करोनामुळे जीव गुदमरला आहे, त्यात हा आणखी त्रास वाढला असल्याने मोकळा श्वास आम्हला घेऊ द्या असा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता थंडीमुळे हवेत धूलिकण दिसत आहेत. बेलापूर भागातही असेच वातावरण आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत आमच्याकडे तक्रारी नाही असे बेजबाबदार प्रतिक्रिया त्यांनी दिली. यामुळे नेमकी नवी मुंबईतील दूषित हवेल जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. “मी नेरूळ एल पी परिसरात राहतो. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूसर वातावरण आणि दूषित हवा परिसरात पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून याचा माझ्या वृध्द आईवडिलांना त्रास जाणवू लागत असल्याचे नेरुळ येथील रहिवाशी – मनिष काळे यांनी सांगितलं”.