अलिबाग, दि.27 : महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीदेखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, अशा शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाड मधील तळीये गावी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

राज्यपाल श्री.कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते सर्व व्यवस्थित करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र सरकार व राज्य शासन करील.

या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, तुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी दरडग्रस्त तळीये गावाच्या स्थळी पुष्पचक्र अर्पण करुन मृतात्म्यांना श्री.कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाडचे तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, तळीये गावाचे सरपंच, दुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी यावेळी उपस्थित होते.